Jagannath Shankar Seth |
महाराष्ट्रातील समाजसुधारक
१) जगन्नाथ शंकरशेठ
(इ. स. १८०३ ते १८६५) - मुंबई ही महाराष्ट्राची ऐतिहासिक, सांस्कृतिक व आर्थिक राजधानी आहे.. त्या मुंबईचे शिल्पकार म्हणून जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांना ओळखले जाते. जगन्नाथ शंकरशेठ यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ रोजी झाला. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील मुरकुटे हे कुटुंब व्यवसायासाठी मुंबईत आले. मराठी, इंग्रजी व संस्कृत भाषेत ते प्रगत होते. त्यांनी आपल्या श्रीमंतीचा व विद्वत्तेचा वापर समाजसुधारणेसाठी केला. जनकल्याणाच्या विविध योजना त्यांनी राबवल्या. व्यापारामुळे इंग्रज अधिकारी वर्गांमध्ये त्यांचा दबदबा होता.
शिक्षणाशिवाय लोकांचा उद्धार होणार नाही हे ओळखून एलफिन्स्टन यांच्या मदतीने त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. या सोसायटीने मुंबईत व मुंबई बाहेर अनेक शाळा सुरू केल्या. 'स्टुडंट लिटररी अॅण्ड सायंटिफिक सोसायटी' च्या स्थापनेसाठी नानांनी फार मोठी आर्थिक मदत दिली. स्त्री शिक्षणाबद्दल नानांना फार आस्था होती. स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या राहत्या घरी मुलींच्यासाठी शाळा सुरू केली. पुढे त्यांनी एलफिन्स्टन कॉलेज सुरू केले. सरकारने मुंबई इलाख्याच्या शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना केली. त्याचे सदस्यत्व नानांना बहाल करण्यात आले. त्याचेच रुपांतर पुढे शिक्षण खात्यात झाले. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेतही त्यांचा सहभाग मोलाचा होता. जनतेची दुःखे सरकारच्या निदर्शनास आणण्यासाठी दादाभाई नौरोजी यांच्या समवेत त्यांनी 'बॉम्बे असोसिएशन' या संस्थेची स्थापना केली. नानांनी आपल्या अधिकाराचा आणि संपत्तीचा समाजासाठी सढळ हाताने वापर केला. नाना मुंबईच्या कायदे मंडळाचे सदस्य होते. त्यांनी गोरगरिबांना व अनेक संस्थांना आर्थिक मदत केली. ते दानशूर होते. सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकांना त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यामुळेच त्यांना मुंबईचे 'शिल्पकार' असे म्हणतात. आचार्य अत्रे त्यांच्याविषयी म्हणतात, 'नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते. ३१ जुलै १८६५ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
jagannath shankar sheth
jagannath shankar sheth information in marathi
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: